हॅना आरेण्ट आणि हुकुमाची ताबेदारी

एखाद्या चित्रपटाचे परीक्षण लिहिताना आपण दोन प्रकारे ते काम करू शकतो.
1. त्या चित्रपटाची कथा, त्यातली कला, दिग्दर्शन, त्यातल्या नटांचे अभिनय इ. ह्यांचे विश्लेषण, रसग्रहण किंवा अगदी चिरफाडही आणि
2. त्या चित्रपटात आलेल्या विषयवस्तुचे, मांडलेल्या विचार, तत्त्वज्ञानाचे – ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक किंवा तदनुषंगिक इतर प्रकारे विश्लेषण.

…पण कधी कधी काही चित्रपट असा एखादा विषय, तत्त्वज्ञान किंवा विचार घेऊन येतात की त्याबद्दल बोलताना, लिहिताना, विचार करताना तो मूळ चित्रपट आणि त्यातला प्रतिपाद्य विषय ह्याना वेगळेच वळण लागते.त्यामुळे मग ते फक्त चित्रपटाचे परीक्षण राहत नाही.

हॅना आरेण्ट

हॅना आरेण्ट हा चित्रपट असाच आहे

म्हणजे रूढ अर्थाने पाहू जाता हा चित्रपट नाझी राजवटीत ज्यू लोकाचे जे अनन्वित हाल झाले, छळ झाले, हत्याकांड झाले त्याला जबाबदार असलेल्या लोकापैकी एक अडोल्फ आईशमनह्याच्या खटल्यामुळे विचारात पडून काही नवीन सिद्धांत मांडणार्‍या एका बाईचा संघर्ष आहे. ह्या विषयावर आलेल्या ‘शिंडलर्स लिस्ट’, ‘द पियानिस्ट’ किंवा अगदी प्रदीर्घ अशा ‘न्युरेम्बर्ग’ ह्या चित्रपटासारखा मात्र तो नाही. ह्या चित्रपटात काय घडते ते थोडक्यात सांगून मग ह्या चित्रपटात नक्की काय सांगायचा प्रयत्न केला गेलेला आहे त्यावर माझ्या आकलनाप्रमाणे प्रकाश टाकायचा प्रयत्न करतो.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच म्हणजे अगदी अजून नावं दाखवली जातायत तेव्हाच, रात्रीच्या वेळी एका निर्मनुष्य, सुनसान रस्त्यावरून चाललेल्या एका वृद्धशा माणसाला काही तरुण जबरदस्तीने उचलून, एका ट्रकमध्ये घालून त्याचे अपहरण करून नेताना दाखवली आहेत. हाच तो कुप्रसिद्ध नाझी क्रूरकर्मा अडोल्फ आईशमन. त्याला उचलून नेणारे असतात इस्रायलच्या जगप्रसिद्ध गुप्तचर संस्था मोसादचे गुप्तचर. सगळ्या जगभरात लवकरच इस्रायलचे पंतप्रधान डेविड बेन गुरियन हे अडोल्फ आईशमानला अर्जेन्तिनात पकडल्याचे आणि त्याच्यावर इस्रायलच्या न्यायालयात खटला चालवणार असल्याचे जाहीर करतात. अमेरिकेच्या ‘न्यूयार्कर’ ह्या प्रसिद्ध दैनिकाच्या संपादकाला पत्र लिहून हॅना आरेण्ट आपल्याला ह्या खटल्याचे वार्तांकन करण्यासाठी जेरुसलेम-इस्रायलला पाठवण्याची विनंती करणारे पत्र लिहिते. हॅना ही जन्माने एक ज्यू. 1933 साली जर्मन गुप्त पोलीस-गेस्टापोनी अटक केल्यावर, मोठ्या शिताफीने जर्मनीतून निसटून अमेरिकेत गेलेली. पुढे प्राध्यापिका – लेखिका – तत्त्वज्ञ म्हणून भरपूर मान्यता पावलेली कर्तबगार, निर्भीड स्त्री. तिची विनंती मान्य होऊन ती जेरुसलेमला येते. संपूर्ण खटला ती बारकाईने आणि शांतपणे बघते. तिथेच तिला तिचा जुना मित्र कूर्त ब्लूमफिल्ड भेटतो. दोघांमध्ये आईशमन, खटला आणि त्याने केलेलं ज्यूंचे हत्याकांड ह्या निमित्ताने चर्चाही होते. हळूहळू तिला आईशमन बाबत एक वेगळीच गोष्ट जाणवू लागते.

अडोल्फ आईशमन

तिला जाणवते की आइशमन हा खरेतर एक फडतूस, क्षुद्र असा माणूस म्हणून देखील अस्तित्वात नाही. त्याला स्वत:च्या अस्तित्वाची जाणीवच नाही. एखाद्या य:कश्चित किटकालाही त्याच्यापेक्षा अधिक स्वत:बद्दल जाणीव असेल पण आदेश, व्यवस्था, कर्तव्य, निष्ठा, आज्ञाधारकत्व असल्या पोकळ कल्पनांच्या आहारी जाऊन, वरिष्ठांच्या आज्ञेबरहुकूम वाट्टेल ते करायला तयार होणारा, स्वतंत्र विचार करणं हे जे माणूसपणाचं लक्षण तेच सोडून दिलेला असा तो जंतू आहे. मात्र इतका क्षुद्र माणूस हाती अधिकार आल्यावर किती पराकोटीचा सैतानीपणा करतो हे पाहून त्या क्रौर्याच्या मूर्तिमंत साक्षात्कारानं ती चरकते… तिला जाणवते की आईशमनच्या मनात ज्युबद्दल द्वेष नाही. तो फक्त ज्यांची चाकरी करतो. (किंवा करीत होता) त्याचा तो निष्ठावंत चाकर आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी तो ब्रह्मवाक्य म्हणून मानतो, करतो… थोडे ओळखीचे वाटते हे? ज्या गोष्टीवर, तत्त्वज्ञानावर आपली अनन्य श्रद्धा आहे त्यासाठी मरायला-मारायला तयार होणारे मानव समूह इतिहासाला (आणि वर्तमानालाही) नवखे नाहीत. सर्वसमावेशक (totalitarian) विचारप्रणाली माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा, सद्सदविवेकबुद्धीचा ताबा घेते आणि या भांडवलावर मग असलं भयानक हत्याकांड घडतं. फक्त हिटलरसारख्या एखाद्या माणसाच्या सैतानी मेंदुवर त्याची जबाबदारी ढकलून आपण निर्दोष ठरू शकणार नाही हे ती ठामपणे आणि जाहीरपणे लिहिते – मांडते. त्याच बरोबर तत्कालीन ज्यू नेत्यांनी घेतलेली प्राय: गप्प बसायची, बोटचेपी भूमिका ही देखिल ह्या नृशंस हत्याकांडाला कारणीभूत ठरल्याचे ती ठासून सांगते. अर्थातच त्यामुळे आईशमनवर असलेली पापाची, हत्याकांडाची जबाबदारी ती कमी करायचा प्रयत्न करते आहे असा त्याचा अर्थ घेतला जातो. समाजमान्य-लोकप्रिय सत्याहून निराळं काही बोलणारी, लोकसंतापाला न जुमानणारी, ‘उद्धट’, ‘भावनाशून्य’, ‘उलट्या काळजाची’, ‘बेईमान’ अशा अनेक शेलक्या विशेषणांनी तिची संभावना झाली नसती तरच नवल. अगदी जवळचे मित्र, गुरुस्थानी असलेले सुहृद, विद्यार्थी-चाहते-वाचक अशा अनेक बाजूंनी तिच्यावर हल्ला होतो. लोकामध्ये विशेषत: ज्यू लोकात संतापाचे उद्रेक होतात पण लोकाच्या संतापाचे, टीकेचे हल्ले झेलूनही ती आपल्या मतावर ठाम राहते पण म्हणून ती विचलित होत नाही असे चित्रपट दाखवत नाही. ती या हल्ल्यांनी घायाळ होते. दुखावली जाते. विचाराची कास मात्र सोडत नाही. स्वत: विचार करणं, निष्कर्ष काढणं आणि त्याबरहुकूम मत बनवणं हेच जिवंत असण्याचं, माणूस असण्याचं सर्वांत मोठं लक्षण आहे हे ती बजावून सांगते. विवेक, सद्सद्विवेक बुद्धीची साथ सोडली तर माणसांची फक्त जनावरं नाही बनत तर ती एका मोठाल्या यंत्रातली गिअर व्हील्स किंवा स्पेअर पार्टस बनून जातात – संवेदनाहीन, विचारशून्य. पडेल ते काम गपगुमान करणारी. यंत्राला आणि त्यातल्या स्पेअर पार्टसला कुठे भावना विचार असतात!

त्याकाळच्या जगभरातल्या ज्युन्प्रती असलेली सहानुभूती आणि अनुकंपेची भावना आणि अमेरिकेतल्या ताकदवान ज्यू लॉबीची पार्श्वभूमीवर लक्षात घेतली तर तिला झालेल्या विरोधाची धार आपल्याला कळू शकेल.

बार्बरा सुकोवा या जर्मन नटीनं हॅनाचं काम सुरेख केलं आहे. लोक हॅनाला नाझीधार्जिणी, ज्यू द्रोही म्हणू लागल्यावर ती तिच्या विद्यार्थ्यासमोर एका व्याख्यानातून/ परिसंवादातून आपली भूमिका पुन्हा मांडते. ह्या प्रसंगात बार्बराने जीव ओतून अभिनय केला आहे. बोलायच्या सुरुवातीला तिच्या मनात थोडी चलबिचल सुरू असलेली जाणवते. आधीच ती सिगारेट पेटवते. आज सुरुवातीलाच सिगारेट शिलगावतेय, समजून घ्या असं ती म्हणते. त्यातून हीच तिच्या मनातली कालवाकालव दिसते. जगभरातली सगळी न्यायालयं माणसावरती खटले चालवून न्याय करतात पण एखादा आरोपी जर आपण आपले मनुष्यत्व हरवून बसलो आहे/होतो असे म्हणत असेल आणि जर ते सिद्ध झाले असेल तर… तर मग काय करायचे? वेडे मानसिक संतुलन हरवलेले लोक अशावेळी सुटतात पण मनुष्यत्व हरवण्याचा हा एकच मार्ग आहे का? आईशमानसारखा मानसिक संतुलन शाबूत असलेला माणूस जेव्हा आपण फक्त एखाद्या यंत्रमानवाप्रमाणे कर्तव्यबुद्धीने हे करत होतो असे म्हणतो तेव्हा काय करायचे? ती आईशमानला निर्दोष मानत नाही पण त्यांनी केलेल्या, घडवून आणलेल्या हत्याकांडाइतकीच किंवा त्याहून काकणभर जास्तच भयानक गोष्ट ही आहे की त्याने स्वत:च्या माणुसपणाची सगळी लक्षणे सिस्टीमपुढे उतरून ठेवली. त्या अर्थी पूर्ण तो सिस्टमला पूर्णपणे शरण गेला. आपले म्हणणे मांडून झाल्यावर ती परत एकदा सिगारेट पेटवते पण ह्या वेळी शांतपणे, मनावरचे ओझे उतरल्याच्या, कृतकृत्य झाल्याच्या भावनेने. (अर्थात याने सगळ्यांचे समाधान होत नाही. आजही तिच्याबद्दल विरोधी लिहिणारे बोलणारे लोक आहेतच.)

इथे चित्रपट संपतो. हा काही फार नाट्यमय रोमहर्षक असा चित्रपट नाही पण केवळ मनोरंजन हे जर चित्रपटाचे मुख्य उद्दिष्ट मानले तर कुठलाही तद्दन गल्लाभरू सिनेमा चांगला असू शकतो. तसा तो खिडकीवर मोठा गल्ला जमा करून सिद्ध करत असतोच आणि याच कारणावरून बहुसंख्य सिनेनिर्माते अशाच प्रकारचे सिनेमे बनवत असतात. म्हणून अशा सिनेमांना आपण हिट-गाजलेले, चाललेले सिनेमे म्हणतो, चांगले म्हणतोच असे नाही. चांगला सिनेमा हिट असो, नसो एक गोष्ट खरी की त्याने उत्तम मनोरंजन केलेच पाहिजे. मला असं वाटतं की तेवढेच पुरेसे नाही. तुम्ही तो सिनेमा संपवून थेटरातून बाहेर पडताना सिनेमा डोक्यात घेऊन बाहेर पडला पाहिजेत. हा चित्रपट पाहून झाल्यावर केवळ तो डोक्यात फिरत राहत नाही तर इतर अनेक प्रश्न उभे करतो.

प्रश्न फक्त एकट्या दुकट्या हिटलर किंवा स्टालिनचा नाही. हा नरसंहार त्यांनी एकट्यांनी घडवून नाही आणला. तसा ते घडवून आणू शकलेही नसते. आईशमन्सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याची फौज उभी करून त्यांच्या कडून हे काम त्यानी करून घेतले. ह्यातली बरीच माणसे कुटुंबवत्सल, स्वत:च्या बायको-मुलांवर अगदी घरातल्या कुत्र्या-मांजरावर सुद्धा प्रेम करणारी होती. काही हळवी, संवेदनशील तर काही कलाकारही होती. निरपराध लोकांवर बंदुकीच्या फैरी झाडताना, त्यांना विषारी वायुच्या कोठड्यात ढकलताना ह्या सहृदय माणसांचे हात-पाय कापत नसत. समोर उभ्या असलेल्या लोकात स्त्रिया, मुलं, गर्भार बाया, अपंग सर्व प्रकारचे लोक आहेत तरी त्यांना त्याचा फरक पडत नसे.

हे कसे शक्य आहे? ती केवळ आज्ञा पाळणारी, विचार न करणारी, हुकुमाचे ताबेदार माणसं होती ती असे म्हणून समाधान कसे होणार? जितके ह्या विषयावरचे चित्रपट डोक्युमेंटरीज, पाहत होतो तितका हा प्रश्न अधिकच सतावू लागे. म्हणून बरीच शोधाशोध केल्यावर कळले की ह्या हॅना आरेण्ट नावाच्या बाईमुळे आणि तिच्या ह्या धक्कादायक मांडणीमुळे, असाच प्रश्न पडून अमेरिकेतल्या येल युनिवर्सिटीचा मानसशास्त्राचा प्राध्यापक स्टेनले मिल्ग्राम हा असा एक प्रयोग करायला उद्युक्त झाला की ज्याचे निष्कर्ष त्याच्यासकट सगळ्यांनाच धक्कादायक ठरले. अनेक वेळा हा प्रयोग केला गेला, अनेक प्रकारे केला गेला, पुढे अनेक जणांनी निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या देशात, विद्यापीठात ह्याचे प्रयोग केले पण निष्कर्ष तेच आले. काय होता तो प्रयोग? आणि त्याचे निष्कर्ष…

हुकुमाची ताबेदारी (Obedience To Authority)

स्टेनले मिल्ग्राम
न्युरेम्बर्ग खटल्याच्या वेळी देखील अनेक नाझी क्रूरकर्म्यानी आपण फक्त वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत असल्याचे सांगितले होते. हा युक्तिवाद किंवा पळवाट न्यायालयात टिकणार नाही हे माहिती असून देखील. आता ही हॅना आरेण्टसुद्धा असलेच काही म्हणत होती पण ती तर आरोपी नव्हती की त्यांची वकीलही नव्हती. त्यांच्याशी सहानुभूती असलेली कुणी हितसंबंधीय ती नव्हती. उलट असली तर त्यांच्या अत्याचाराची झळ बसलेली एक होती.
मग हे काय गौड बंगाल आहे ह्याचा सोक्ष मोक्ष लावायचा निर्धार स्टेनले मिल्ग्राम ह्यायेल युनिवर्सीटीच्या मानसशास्त्राच्या प्राध्यापकाने लावायचे ठरवले.

ह्या प्रयोगात तीन लोक सामील होत असत. एक जण तर स्वत: प्रयोग करणारा निरीक्षकच असे, एक शिक्षक आणि एक विद्यार्थी. ह्यातला विद्यार्थी हा निरीक्षकाचा मदतनीसच असे पण शिक्षक झालेल्या स्वयंसेवकाला ते माहिती नसे. म्हणजे शिक्षक हाच खरा अभ्यासाकरता निवडला गेलेला व्यक्ती असे. तर ह्यात शिक्षकाला एक प्रश्नावली दिली जात असे आणि त्याची उत्तरेही असत. जो विद्यार्थी आहे, तो शिक्षकाला दिसणार नाही पण त्याचा आवाज ऐकू येईल असा शेजारील खोलीत बसलेला असे. शिक्षकाने एक एक प्रश्न त्याला विचारायचा आणि जर विद्यार्थ्याने उत्तर चुकीचे दिले तर समोर असलेल्या टेबलावरचे बटन दाबायचे. म्हणजे त्या विद्यार्थ्याला विजेचा शॉक बसत असे. हळूहळू ह्या शॉकचे प्रमाण वाढत नेले जाई. शॉकचा झटका वाढत जाई तसतसा विद्यार्थी आरडाओरडा करे, किंकाळ्या ठोके ते अगदी शिक्षकाला तसे न करण्यासाठी गयावया करीत असे. अगदी रडत भेकत असे. (प्रत्यक्षात त्याला काहीही शॉक वगैरे दिला जात नसे, तो फक्त नाटक करीत असे पण शिक्षकाला वाटे की त्याला खरेच यातना होताहेत.)

अपेक्षा आणि वास्तव
ह्यात भाग घेतेलेले सर्व अगदी सर्वसामान्य लोक असत. अगदी आपल्यासारखे. मग आपल्याला वाटेल की त्या सर्वसामान्य माणसाने पहिल्यांदाच विद्यार्थ्याची किंकाळी ऐकली की तो प्रयोग थांबवायला सांगत असेल. आपण जर त्या शिक्षकाच्या जागी असू तर नक्की हेच करू नाही का? (हां! एक सांगायचे राहिले, त्या शिक्षकाला प्रयोग सुरु होण्यापूर्वी सांगितले जात असे की काय वाट्टेल ते झाले, ह्या प्रयोगात विद्यार्थ्याला गंभीर इजा झाली किंवा अगदी त्याचा मृत्यू जरी झाला तरी त्याची जबाबदारी पूर्णपणे निरीक्षकाची असेल, शिक्षकाची नाही.) एका वेळी हा प्रयोग अनेक शिक्षकांवर केला जात असे पण पहिल्या किंकाळीलाच प्रयोग थांबवून बाहेर पडणार्‍याची संख्या शेकडा फक्त 1-3 असे. मिल्ग्रम्च्या मते हे प्रमाण खरेतर प्रयोग पूर्ण करणार्‍या लोकाचे असायला हवे. अनेक जण विद्यार्थ्यांच्या किंकाळ्या ऐकून काळजी व्यक्त करीत, खरेच अशा यातना द्यायची गरज आहे का? म्हणून विचारत. 60 – 65 % लोक कोणताही आक्षेप न घेता प्रयोग पुढे चालू ठेवत. जे लोक आक्षेप घेत, काळजी व्यक्त करत, ह्या शॉकची गरज आहे का म्हणून विचारत त्यांना खालील प्रकारे सांगितले जात असे.

1. कृपया प्रश्न विचारू नका, प्रयोग पुढे सुरु ठेवा.
2. तुम्ही हा प्रयोग पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे.
3. तुम्ही साथ नाही दिली तर प्रयोग पूर्ण होऊ शकत नाही.

कुठेही त्याना आदेश दिला जात नसे, सक्ती केली जात नसे किंवा धमकावले जात नसे आणि तीन वेळा विनंती करूनही जर त्यांनी थांबायचीच इच्छा व्यक्त केली तर प्रयोग थांबवला जात असे. तरीही फक्त 5-6% लोक प्रयोग थांबवत. बाकीचे प्रयोग पूर्ण करत असत.

निष्कर्ष –
सर्वसामान्य माणसं जर त्यांच्यावर परिणामांची जबाबदारी टाकली नाही तर जो परिणामांची जबाबदारी घेत असेल, त्याच्या आज्ञांचे शब्दश: पालन करीत, त्यांचा विवेक, सद्सदविवेक बुद्धी त्याच्या आड येत नसे. आश्चर्य म्हणजे ह्या प्रयोगात स्त्रियाही सामील केल्या गेल्या आणि पुरुष आणि स्त्रीयामध्ये काहीही फरक सापडला नाही.

आपण असे का आहोत? मिल्ग्राम ह्याने निष्कर्ष काढला की माणूस लाखो वर्षापासून उत्क्रान्त होत असताना समूहाच्या नेत्याची आज्ञा पाळणे हा त्याचा सहजभाव (instinct) बनला आहे. समूहाच्या नेत्याचे (alpha male) न ऐकणे, समूहातून वेगळे होणे, बहिष्कृत होणे म्हणजे मृत्यू हे समीकरण पिढ्यानपिढ्या भिनले आहे. पुढे ही असुरक्षिततेची, समुहात सामावून घेतले जाण्याची भावना इतकी प्रबळ होते की त्यापुढे क्रूर वर्तन, स्वत:च्या सदसद्विवेकाशी प्रतारणा, स्वजातीयांतल्या दुबळ्या घटकांवर अत्याचार करतना त्याला काही वाटत नाही.

सर्व प्रकारच्या विचारधारा मग त्या धर्म असो वा साम्यावादा सारखे सामाजिक विचार असो त्यांना मूळ धरायला निष्ठावंत कार्यकर्त्यांची गरज असते आणि त्या विचारधारा जितक्या अधिक कठोरपणे माणसांच्या कृती नियंत्रित करत असतील आणि त्यांच्या कल्याणाची, सुरक्षेची हमी जितक्या जोरदारपने देत असतील तितक्या त्या जास्त लोकप्रिय होतात.

(आपल्याकडच्या जातिव्यवस्थेच्या इतकी वर्षे टिकून राहण्याच्या, रुजण्याच्या यशाचे स्पष्टीकरण कदाचित ह्या प्रकारे होऊ शकेल. अजून तसा प्रयत्न कुणी केल्याचे मला माहिती नाही.)

माणुस इतक्या सहजपणे आपले माणुसपण हरवून बसू शकतो नव्हे हरवतोच. तसे इतिहासात अनेक वेळा झालेले. वर्तमानातही ते घडताना आपण पाहतोच आहोत. त्याचा दोष देण्यासाठी संबंधित धर्म, धर्मग्रंथ किंवा विचारधारा, तत्त्वज्ञानाला जबाबदार धरले जाते. त्या दृष्टीने संशोधन केले जाते पण ह्यात सामील असलेला अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे अनुयायी माणूस. त्याकडे फारसे कुणी लक्ष दिले नव्हते. त्याच्या मूक संमतीशिवाय आणि सक्रीय सहभागाशिवाय हे काहीही घडणे शक्य नाही ही बाब कुणी लक्षात घेतलीच नव्हती.

त्या अनुयायी असलेल्या माणसाची मनोभूमिका कारणमीमांसा शोधण्याच्या दृष्टीने शास्त्रशुद्ध प्रयत्न 1962 साली प्रथम सुरु झाले आणि त्यामागची प्रेरणा ठरली हॅना आरेण्ट.

हॅना आरेण्ट. चित्रपटाची माहिती
दिग्दर्शक – मार्गारेटं फॉन ट्रोटा
कलाकार – बार्बरा सुकोवा, जेनेट मॅकटीअर, क्लाउस पोल, निकोलस वूडसन, ऍक्सेल मिल्बर्ग.
भाषा – जर्मन (पण इंग्लिश भाषांतर caption उपलब्ध आहेत.)
प्रदर्शन वर्ष – 2013
निर्माता देश – जर्मनी
चित्रपटातील तिच्या शेवटच्या भाषणाची (इंग्लिश) यु ट्यूब लिंक खाली दिली आहे (संपूर्ण चित्रपट free viewing मध्ये उपलब्ध नाही.)

तिच्या मुलाखतीची लिंक (original)

मागे मी एक इस्रायल आणि मोसादवर लेखमाला लिहायला घेतली होती. तिच्या पहिल्या भागानंतर आलेल्या प्रतिक्रियात मला एकाने प्रश्न विचारला होता. त्याचे समाधानकारक उत्तर मलाच न मिळाल्याने मी पुढे लिहिण्याचे थांबवले होते. तो भाग साधारण असा –

आपण ज्यू लोकांच्या हत्याकांडाशी संबंधीत काही जुने (खरे) विडीयो यु ट्यूबवर पाहतो तेव्हा शेकडो यहुदी स्त्री-पुरुष, वृद्ध, मुलं, अगदी तान्ही बाळं ह्यांना एकत्र करून, विवस्त्र करून गॅस चेंबरमध्ये ढकलत असलेले किंवा फायरिंग स्क्वॉडसमोर उभे केले जात असलेले दिसते. आता पुढे काय होणार हे डोळ्यासमोर दिसत असताना त्यांच्यापैकी एकही जण प्रतिकार करायचा साधा प्रयत्नही करत नाही! मरायचेच आहे तर किमान एक दगड, एक लाथ, अगदी एक बुक्की तरी मारू असे एकालाही वाटत नाही? लहानसे मांजराचे पिल्लू आपण जर कोपर्‍यात कोंडले तर ते पळून जायचे सगळे उपाय थकले हे समजून, शेवटचा उपाय म्हणून आपल्यावर हल्ला करते. ते कितीही लहान, अशक्त असले तरीही. ही नैसर्गिक प्रेरणा आहे पण हे यहुदी! ही तर माणसं होती! मग ही अशी निमूटपणे मृत्युच्या दाढेत का गेली? ते सुद्धा आपल्या म्हातार्‍या आईवडील, बायको ते अगदी तान्ह्या बाळांना कडेवर घेऊन.

Gas chambers ही त्यांना न्हाणी घरच आहेत असे वाटत राहिले. जर्मनांनी व्यवस्था अशी लावली होती की त्यांना कळूच नये आपण मरायला चाललोय अशी स्पष्टीकरणं अनेकजण देतात पण (मला तरी) 60 लाख मृताची ही प्रचंड संख्या पाहता ते पटत नाही. नाझींच्या अत्याचारापेक्षा त्यांची ही अगतिकता, परिस्थितीपुढे पत्करलेली शरणागती मला कधी कधी जास्त क्रूर वाटते. मला ह्या घटनेचे आश्चर्य वाटते. अनेक प्रकारे मी ह्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला पण समाधानकारक उत्तर अजून तरी नाही मिळाले. कदाचित, परिणामांची जबाबदारी दुसर्‍याने घेतल्यावर सर्वसामान्य माणसे सुद्धा वाटेल तसे अत्याचार करायला राजी होतात हे मिल्ग्रमने प्रयोग करून दाखवले तसे ह्या मागे काही मानस शास्त्रीय विवेचन असेल का? कुणी तसा प्रयोग केला असेल का?

(तसेच यहुद्यानी अगदीच प्रतिकारही केला नाही असे अजिबात नाही पण ते प्रयत्न फार कमी आणि अगदी अपवादात्मक म्हणावे असे होते. त्यामानाने पराभूत फ्रान्समधली भूमिगत चळवळ जर पाहिली तर कुणाही फ्रेंच माणसाचा उर अभिमानाने भरून येईल असा तो होता… त्यामुळे 60 लाखांच्या शिरकाणाबद्दल जरी प्रचंड राग जर्मनाबद्दल किंवा नाझ्याबद्दल ज्यूंना वाटतो तसेच जे 60 लाख मेले त्याच्याबद्दल त्यांना कणव कमी आणि लाज जास्त वाटते. त्यांच्या मृत्युला ते शहादत मानत नाहीत, ते स्वातंत्र्यलढ्यात मेले नाहीत ह्याची जाणीव त्यांना आहे. असो यहुदी नंतर ह्यातून खूप शिकले हा सगळ्यात महत्वाचा भाग. ह्याबद्दल स्वत: याहुद्यानीच अनेक वेळा वरीलप्रमाणे विचार व्यक्त केले आहेत.)
मला अजूनही ह्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर नाही मिळाले…
अजूनतरी! शोध चालू आहे!

– आदित्य कोरडे, पुणे
७२७६०९७०८२

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “हॅना आरेण्ट आणि हुकुमाची ताबेदारी”

  1. Dattatray

    अप्रतिम लेख व माहिती आपल्या मतांवर ठाम राहणं अगदी जग व आपलीच माणसं विरोधात गेले तरीही

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा