पुस्तकं ही प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी असतात. काही पुस्तकं माणसांच्या जीवनावर परिणाम करतात. काही पुस्तकं माणसाला जगण्यासाठी शक्ती,प्रेरणा देत असतात. मात्र काळ जसा पुढे सरकत जात राहतो, त्याप्रमाणे काही पुस्तकं पुढच्या पिढीसाठी टिकून राहतात. काही मात्र काळाच्या ओघात मागे पडतात. पुस्तके मागे पडतात म्हणजे ती संपतात असं होत नाही. ती पुस्तके एका पिढीने दुसऱ्या पिढीच्या हातात देण्याची आवश्यकता असते, पण शंभर वर्षापूर्वीची इतिहासातील काही चांगली पुस्तके नवाचकांना अनुभवता यावीत, त्या पुस्तकाची अनुभूती छोट्याशा परिचयातून वाचकांना व्हावी या दृष्टीने पुस्तकांचा इतिहास सांगणारे, पुस्तकांची गोष्टींचा अनुभव देणारे ‘ पुस्तकानुभव ’ हे प्रा. दिलीप फडके यांनी लिहिलेले पुस्तक वाचकांना गतकाळातील पुस्तकांचे विश्व उलगडून दाखवते आहे. खरंतर हे पुस्तक वाचताना यातील अनेक पुस्तके आपली वाचायची राहून गेली असे अनेकदा वाचकांना वाटून जाते. मात्र पुस्तक वाचल्यानंतर आपण हे पुस्तक वाचायला हवे म्हणून वाचकांच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण होते हेच या पुस्तकाचे यश आहे.
खरं तर, एखाद्या माणसाने अत्यंत उत्तम दर्जाची पुस्तके मिळवावी, ती वाचावी आणि या पुस्तकातील उत्तमोत्तम काय आहे, हे वाचकांपर्यंत पोहोचवावे, हे मोठं काम आहे. ते काम प्रा. फडके यांनी या पुस्तकाच्या निमित्ताने केले आहे. हे पुस्तक म्हणजे ज्ञानरूपी अमृताचा प्रचंड मोठा ठेवा आहे. हा ठेवा नव्या पिढीच्या हाती सोपवला आहे. त्यामुळे हे पुस्तक म्हणजे शंभर वर्षांपूर्वीच्या अधिकाधिक चांगल्या पुस्तकांचे विश्व उलगडून वाचकांना समृद्धतेचा प्रवास घडवणारे आहे. त्या दृष्टीने हे पुस्तक अधिक महत्त्वाचे ठरते. आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, मात्र हा दर्जा मिळवून देण्यासाठी मराठीतील साहित्य प्रवाह सातत्याने उंचावलेला गेला आहे. शंभर वर्षांपूर्वीची ही पुस्तके आपल्या मराठीचे अभिजातपण टिकवणारी आहेत. त्यामुळे हे पुस्तक वाचताना शंभर वर्षांपूर्वीदेखील मराठी साहित्य किती समृद्ध आणि उच्च दर्जाचे होते, हे वाचकांच्या सहज लक्षात येते. प्रा. दिलीप फडके यांनी या पुस्तकामध्ये एकूण ४५ पुस्तकांचा अत्यंत वाचनीय आणि सहज सुलभ परिचय करून दिला आहे. यातील काही पुस्तकांची केवळ नावे वाचली, तरी किमान ती नावे ऐकली आहेत, असे अनेकांना वाटून जाईल. अशा काही पुस्तकांचा समावेश या पुस्तकात करण्यात आलेला आहे. ‘नीतीदर्पण’ या पुस्तकापासून पुस्तकांचा परिचय सुरू होतो आणि ‘परमात्मा सोपान’ या पुस्तकापर्यंत येऊन थांबतो. हे सारे पुस्तक वाचताना जुन्या काळातील पुस्तकांच्या परिचयाचे हे सहज आणि सोपे पुस्तक झाले आहे.
या पुस्तकामध्ये ज्या पुस्तकांविषयी भरभरून लिहिले गेले आहे, ती सर्व पुस्तके १८३० ते १९१० या कालखंडातील आहेत. आता ती सारीच पुस्तके दुर्मिळ झाली आहेत. पुस्तकांची निवडदेखील अत्यंत चांगली आहे. वाचकांना इतिहास उलगडत जात असताना त्या काळातील माणसांच्या विचारांची प्रक्रियादेखील समजत जाते. वर्तमानात जी गरज वैचारिक प्रवासात समाजाला वाटते आहे, तो विचार त्याही काळात केला गेला होता, हे लक्षात येते. ‘नीतीदर्पण’ या पुस्तकाविषयी लिहिताना म्हटले आहे की, हे पुस्तक जीवनमूल्यांना नव्या काळाचा संदर्भ देऊन अर्थ सांगणारे पुस्तक आहे. १८३१ साली या ग्रंथाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. या पुस्तकामध्ये एकूण दहा कथांचा समावेश करण्यात आला आहे. कथेच्या अखेरीस कथेचे सार सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इंग्रज लोक आरंभी अज्ञानी, दरिद्री, जंगली मनुष्यांसारखेच होते. मात्र, त्यांच्यात नेमके परिवर्तन कशामुळे आले, असा प्रश्न विचारला गेला, तर त्याचे उत्तर त्यांच्या अंगी विद्या होती, हेच मिळते. शिक्षणाचे मोल त्याही काळापासूनच अनेक ग्रंथांमधून अधोरेखित करण्याचा प्रयत्न झाला आहे. तो प्रयत्न याही ग्रंथात करण्यात आला आहे. इंग्रज या देशात आल्यानंतर नेमके काय बदल झाले आहेत, हे सांगणारी अनेक विवेचनात्मक पुस्तके त्याही काळात तत्कालीन विद्वानांनी लिहिली होती. त्यांनी शिक्षण सुरू केल्यानंतर पाश्चात्त्य मूल्यांचा विचार, विवेक आणि शहाणपणाची वाट दाखवेल, असा विश्वास वाटत होता. अनेकांनी इंग्रजांचा तिरस्कार केला असला, तरी या पुस्तकातदेखील लोकांना इंग्रजांचे राज्य नको होते, असे निदान या लिखाणावरून दिसत नसल्याचा निष्कर्ष नोंदवला आहे. इंग्रजांनी या देशातील लोकांना रोजगार दिला, कामाचे निश्चित तास आणि पैसे दिले, व्यापार वाढवला, कापूस उत्पादनासाठी जमीन दिली, अशा अनेक गोष्टींची नोंद याही पुस्तकात झालेली दिसते. या पुस्तकांमध्ये वर्तमानात असलेल्या मूल्यांचा विचार त्याही काळामध्ये अधोरेखित करण्यात आला होता. या कथांमध्ये दोन विरुद्ध टोकांच्या कथाही वाचकांना वाचायला मिळतात – चांगली बाजू, वाईट बाजू, चांगले वागल्याचे फळ, वाईट वागण्यामुळे मिळणारे फळ, यांसारख्या अनेक गोष्टी यात नोंदवण्यात आल्या आहेत. चांगुलपणाच्या व्याख्याही करणारे काही निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. विष्णुशास्त्री बापट यांचे हे पुस्तक वाचताना लेखक समाजभिमुख विद्वान होते, हे सहजपणे लक्षात येते. आजच्या समाजात विद्वानांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे, याबद्दलची खंतही लेखक नोंदवतात. वर्तमान आणि इतिहास यांची सांगड अनेक ठिकाणी घातली असली, तरी वर्तमानाचे वास्तव विदारक असल्याचे प्रतिबिंबित होते.
नाशिक शहरामध्ये पहिली शाळा सुरू करणारे फरार कुटुंब आणि त्यांच्या संदर्भातील बरेच काही ‘कुटुंबप्रवर्तननीती’ या पुस्तकात वाचायला मिळते. हे पुस्तक १८३५ साली प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक भाषांतरित असल्याचे पुस्तकाविषयी त्यावर नमूद केलेल्या माहितीवरून लक्षात येते. हे पुस्तक त्या काळातील शिळाप्रेसवर छापण्यात आलेले आहे. पुस्तक शिक्षण व पालकत्वाविषयी बरेच काही सांगणारे आहे. मुलांचे नुसते पालनपोषण केले म्हणजे आई-वडिलांची जबाबदारी संपत नाही, तर त्यांना संस्कारांकडे वळवावे लागते, हीदेखील आई-वडिलांची जबाबदारी आहे, असेदेखील नमूद केले आहे. हा ग्रंथ कीर्तीसाठी किंवा लाभासाठी केलेला नाही, तर लेकरांच्या हितासाठी उत्तम शिक्षण मार्ग दाखविण्यासाठी लिहिण्याचा उल्लेख करण्यात आला असल्याचे पुस्तकात आढळते. इंग्लंडमध्ये मुलांच्या शिक्षणाविषयी फार महत्त्व दिले जाते. अंकुर जसा वळविला तसा वृक्ष वाढतो, तसेच अर्भक ज्या मार्गात प्रवृत्त केले, त्या मार्गास प्रवृत्त होते. आई-वडिलांमध्ये मतभेद नसावेत आणि मतभेद निर्माण झाले तरी मुलांपुढे ते मुद्दाम लपवावेत, अशी सूचनाही त्या काळात दिलेली दिसते. अर्थात, या लेखातील सर्व निरीक्षणे वर्तमानात जशी आहेत, तशीच लागू पडतात, हे वाचताना जाणवत राहते. मुलांच्या चुकांच्या गांभीर्याच्या प्रमाणात त्यांना शिक्षा करावी. आपल्याला किती राग आहे, यावर ते अवलंबून नसावे. हे सांगताना ‘राग काही आपणास, संतोष काही दुसऱ्यास’ या मराठी म्हणीचा फरार बाई वापर करतात. एकूणच, धर्मप्रसारासाठी आलेल्या एका महिलेने इतिहासात स्थानिक भाषा आत्मसात करून पुस्तक लिहिणे, ही गोष्ट उल्लेखनीयच म्हणायला हवी. वर्तमानात पालकत्व ही महत्त्वाची गोष्ट असताना, सुमारे २०० वर्षांपूर्वी अशा प्रकारचा विचार करणारे पुस्तक बाजारात येणे, हे उल्लेखनीय म्हणायला हवे. नाशिक शहरात प्रकाशित झालेले हे सर्वात जुने पुस्तक आहे, असे मानले जाते.
आज जगभरात व्यवस्थापन शास्त्राविषयी बोलले जाते. वेळेचे महत्त्व सांगणारी पुस्तकेदेखील बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, सव्वाशे वर्षांपूर्वीदेखील त्या संदर्भाने काही पुस्तके लिहिली गेली होती. दत्तात्रय लोहकरे या लेखकाने पंच्याहत्तर पानांचे हे पुस्तक १९०६ साली प्रकाशित केले होते. जी. बी. नाईक या घड्याळ्याच्या उत्पादित कंपनीने हे पुस्तक प्रायोजित केले होते, त्यामुळे पुस्तकात जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. वेळेचे महत्त्व सांगणाऱ्या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यातील प्रथम क्रमांकाचा निबंध पुस्तकात प्रकाशित करण्यात आला आहे. वेळेचे महत्त्व सांगताना लेखकाने संतांची वचने आणि इंग्रजी सुवचनांचा विचार केला आहे. माणसांची विभागणी सद्वर्तनी आणि दुर्वर्तनी अशी केलेली दिसून येते. ही माणसे आपला वेळ कसा खर्च करतात, याविषयी या पुस्तकात बरेच काही वाचायला मिळते. आयुष्याचा संचय व्हावा, या संदर्भाने अत्यंत उत्तम स्वरूपाचे विवेचन या पुस्तकात वाचायला मिळते. मुळात वेळेचे नियोजन करताना त्याकाळीदेखील किती सूक्ष्म विचार केला जात होता, हे सहजपणे लक्षात येते. आपला वेळ वाया जातो, याची बोचणी मनात लागायला हवी, त्यासाठी माणसाने रोजनिशी लिहिण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.आज आपल्या बोलण्यात म्हणींचा वापर केला जातो. मराठी भाषेची जी वैशिष्ट्ये आहेत, त्या संदर्भाने लिहिताना विद्याधर वामन भिडे यांनी १८९१ मध्ये ‘म्हणींविषयी चार शब्द’ ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. या पुस्तिकेत म्हणींविषयी सर्व काही वाचायला मिळते. म्हणी म्हणजे काय, त्याची कोणती गुणधर्म आहेत, त्या कशा उत्पन्न होतात, त्यांचा भाषेत काय उपयोग होतो, ज्ञानात कशी भर पडते, याविषयी लिहिले आहे. ‘म्हण म्हणजे शहाणपणाने भरलेले वचन आहे,’ असे लेखकाने नमूद केले आहे. ‘जे ज्ञान दिलेले असेल, ते चटकदार रीतीने दिलेले असावे,’ असेही नमूद केले आहे. म्हणीचे गुण सांगताना त्यांनी म्हटले आहे की, ज्ञान, वैलक्षण्य, संकोच, जनसंमती यांबरोबर इतर गुणांचाही ऊहापोह केलेला दिसून येतो. माणसांच्या अनुभवासोबत म्हणींचा वापर वाढत गेला. व्यवहारातील ज्ञान लोक म्हणींच्या स्वरूपात साठवून ठेवत असत. या पुस्तकात भिडे यांचे भाषेवरील प्रेम, भाषेतील शब्दांवरचे प्रेम पुस्तिकेत वारंवार व्यक्त होते. यासह शुचीर्भूतपणा, विद्यार्थी, गुजराथ देशाचा इतिहास, जॉर्ज वॉशिंग्टन याचा इतिहास, कॅप्टन कूकसाहेब यांचे जलपर्यटन वृत्तांत, अर्थशास्त्रपरिभाषा, यमुनापर्यटन, प्राकृत कवितेचे पहिले पुस्तक, मुंबईचे वर्णन, विधवाविवाह, श्री शिवाजी चरित्र, हिंदुस्थानास दरिद्र्य येण्याची कारणे, इतिहासातील निबंध, वकृत्त्वकला विवेचन, लेखरत्नमाला अथवा नाना फडणविसांचे निवडक पत्रांचा संग्रह, शोकिन नानूजीशेट आणि तारा नायकीन, शिवछत्रपतींचे चरित्र, अबलोन्नतिलेखमाला, अफझूल खानाच्या मृत्यूचा फार्स, म्हणींविषयी चार शब्द, मुंबईचा व्यापार, जावजी दादाजी चौधरी यांचे चरित्र, कर्तव्यसुख अथवा संसारसुख, दारिद्र्य घालविण्याचे सोपे उपाय, औद्योगिक सहकारिता, महाराणी लक्ष्मीबाईसाहेब, ब्राह्मण आणि त्यांची विद्या, हिंदू व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयी विनंती, विचारसाधन, सर दिनकरराव राजवाडे मशीरखास मुंतजीम बहादूर यांचे चरित्र, नशीब आणि उद्योग, अर्थशास्त्र, वक्तृत्वकला, ग्यारिबाल्डी, लक्ष्मण बापूजी उर्फ भाऊराव कोल्हटकर यांचे चरित्र, जपान, मराठी खेळाचे पुस्तक, शुश्रूषा, जपानची मर्दूमकी यांसारख्या अनेक लेखांचा समावेश केला आहे. मुळात हे पुस्तक वाचताना यातील सर्वच पुस्तके आपण वाचायला हवीत, असे वाटून जाते, हेच या पुस्तकाचे यश आहे. पुस्तकाची भाषा साधी, सोपी आणि वाचकांच्या हृदयाला भिडणारी आहे. पुस्तकातील नेमके सार अत्यंत कमी शब्दांमध्ये सांगण्याची कला प्रा. फडके यांनी साधली आहे. हे पुस्तक हाती घेतल्यावर पूर्ण वाचल्याशिवाय हातून सुटत नाही. हे पुस्तक चपराक प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. अत्यंत देखणे आणि सुंदर असेच हे पुस्तक झाले आहे. प्रत्येकाने वाचावे आणि आपल्या इतिहासातील पुस्तकांबरोबर विचारांची प्रक्रिया अत्यंत कमी शब्दांत समजून घ्यावी. मराठीचे वाङ्मय पण किती विविध विचारांनी समृद्ध केले होते, हे पुस्तक वाचताना सहजपणे लक्षात येते. अर्थात, हे पुस्तक मराठीच्या प्रवासातील एक महत्त्वाचे पुस्तक ठरणार आहे, म्हणूनच प्रत्येकाने वाचायला हवे. खरं तर, प्राध्यापक फडके यांचे या निमित्ताने अभिनंदन करायला हवे. इतकी जुनी पुस्तके आणि त्याचे सार या निमित्ताने वाचकांच्या हाती दिले आहे. त्यांनी दिलेले हे पुस्तक वाचकांना मराठीच्या पुस्तक इतिहासाचे पान पुन्हा पुन्हा उलगडून पाहण्याची जिज्ञासा निर्माण करते. पुस्तकाला मिलिंद जोशी यांची प्रस्तावना लाभली आहे, तर ज्योती घनश्याम यांनी अत्यंत समर्पक व अर्थपूर्ण मुखपृष्ठ रेखाटले आहे.
– संदीप वाकचौरे
प्रसिद्धी – दै. नायक
पुस्तकाचे नाव- पुस्तकांनुभव
लेखक- प्रा. दिलीप फडके
प्रकाशक – चपराक प्रकाशन.पुणे
पाने -192
किंमत- तीनशे रुपये