‘‘अहो, उठा ना, गाढवासारखं काय लोळताय? मिक्सर चालू होत नाही’’ सुषमाने किचनमधून आवाज टाकला.
‘‘अगं मग मी काय करू? माझ्या झोपण्याचा आणि मिक्सर चालू होण्याचा काय संबंध आहे का? मी काय मिक्सर दुरुस्तीवाला वाटलो का?’’ आम्हीही वैतागून म्हटलं आणि कूस बदलून परत झोपलो.
‘‘अहो मला स्वयंपाक करायचाय’’ सुषमानं आवाजाची पट्टी तीच ठेवत म्हटले.
‘‘अगं मग कर ना. मी काय किचनओट्यावर झोपलोय का?’’आम्ही उत्तर दिले.
‘‘तुम्ही डाराडूर झोपा आणि मी मात्र दिवस-रात्र काबाडकष्ट करते. तुम्ही तिकडे झोपलेले असल्यावर मला काम करताना उत्साह येईल का? काल आपण गावाला गेलो होतो. त्यामुळे तुम्ही मोटार चालवत असताना मला डुलकी लागली. त्यावेळी तुम्ही काय म्हणालात? मोटार चालवत असताना चालकाच्या शेजारी बसलेली व्यक्ती जर झोपायला लागली तर चालकालाही झोप लागते. त्यामुळे तू झोपू नकोस. मग मी स्वयंपाक करत असताना तुम्ही जर झोपून राहिले तर मलाही झोप येणार नाही का? म्हणून म्हणते तुम्ही लवकर उठा.’’
बायकोची तर्कसंगती ऐकून आम्हाला काय बोलावे, हेच सुचेना झाले. तरीही आम्ही म्हणालो, ‘‘अगं, गाडी चालवणं वेगळं आणि स्वयंपाक करणं वेगळं. दोन्ही गोष्टींची सांगड घालू नकोस. दुसरं म्हणजे गाडी चालवताना शेजारचा झोपला तर जिवावर बेतू शकतं’’ आम्ही खुलासा केला.
‘‘म्हणजे तुम्ही करत असलेली कामं फार ग्रेट आणि आमची कामं एकदम किरकोळ असंच ना. घरातील व्यक्ती झोपलेली असताना स्वयंपाक करणार्या बाईलाही डुलकी लागू शकते. त्यातून गॅस गळती होऊन जिवावर बेतू शकते, हे तुमच्या लक्षात येणार नाही. आमच्या कामाला काही किंमतच नाही’’ असं तिनं म्हटलं. त्यानंतर ‘दुसरी कोणी असती तर कधीच पळून गेली असती. मी म्हणून टिकले’ हे नेहमीचं जगप्रसिद्ध वाक्यं तिनं म्हटलं. हे वाक्य दिवसातून दहा वेळा तरी म्हटलंच पाहिजे, असा तिचा नियम आहे. या वाक्याला भांडी आदळण्याच्या आवाजाचं पार्श्वसंगीतही ती देत असते. हा सगळा प्रकार बघून नाइलाजानं आम्ही अंथरूण भिरकावून दिलं.
‘‘तुम्हाला म्हणजे कसली शिस्त नाही. अंथरूण असं भिरकावून देतात का? आधी त्याची नीट घडी घाला व नंतर मिक्सरला काय झालंय ते पाहा’’ बायकोनं आदेश दिल्यानंतर निमूटपणे आम्ही त्याचं पालन केलं. हे करताना आमच्या मनात राग धुमसत होता मात्र तो चेहर्यावर उमटणार नाही, याची आम्ही काळजी घेतली. तरीही मनातील राग व्यक्त करण्यासाठी आम्ही बायकोचा कान समजून मिक्सरचे बटन तीन-चार वेळा जोरात पिळले. त्यावेळी कोठे आम्हाला समाधान लाभले.
‘‘अगं लाइट गेलीय. त्यामुळे मिक्सर चालू होत नाही’’ आम्ही स्वीच बोर्डाची तीन-चार बटणे दाबत म्हटले.
‘‘असं झालंय होय! तरी म्हटलं टीव्ही पण का चालू होईना! तुम्ही ताबडतोब महावितरणला फोन करून लाइट चालू करायला सांगा. आमची कामे खोळंबलीत म्हणावं. एवढं बिल भरतोय तरी लाइट जातेच कशी? काही काळ-वेळ बघून लाईट घालवावी ना. आम्ही झोपलेलो असतो, त्यावेळी रात्रभर लाईट चालू असते आणि आम्ही कामाला सुरुवात केल्यावरच तुम्ही लाईट कशी घालवता? काही ताळतंत्र वगैरे काही आहे की नाही? त्यांना चांगलं खडसावा’’ सुषमानं आदेश दिला.
अशा वेळी काय बोलावं, हे आम्हाला सूचत नाही पण पुढचं महाभारत टाळण्यासाठी तिचं ऐकणं हिताचं असतं, हा आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे. त्यामुळे आम्ही महावितरणच्या कार्यालयात फोन लावला.
‘‘कात्रजवरुन सुधीर खारवडेकर बोलतोय. अशी कशी लाईट घालवता? काही टाईमटेबल आहे की नाही? आमच्या घरातील कामे खोळंबली आहेत. लाइट चालू करा. वाटल्यास दहा मिनिटांनी पुन्हा बंद करा.’’
आमचे हे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच पलीकडून फोनचा रिसीव्हर आपटल्याचा आवाज आला पण काही झालेच नाही, असे समजून आम्ही कानाला लावलेला फोन तसाच ठेवला.
‘‘बरं बरं. दहा मिनिटांनी चालू करताय का? चालेल! पण लाइट नाही आली तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेवा. तुमच्या चुकीची शिक्षा आम्ही का भोगायची?’’ असे म्हणून आम्ही बायकोकडे पाहत कानावरील फोन काढला. यावेळी मात्र तिच्या डोळ्यांत आमच्याविषयी कौतुक दाटलं होतं. अधून-मधून आम्हाला आमच्या स्वभावाविरुद्ध असं वागावं लागतं. त्यामुळे बायको खूश होते. त्यानंतर खरंच दहा मिनिटांनी लाइट आली. मनातल्या मनात आम्ही देवाला धन्यवाद दिले. बायकोच्या मनात आमच्याविषयी आदर दाटल्याचे दिसले. ‘तुमच्या शब्दाला किंमत आहे बरं का’ असं ती मनातल्या मनात म्हणत असल्याचं आम्हाला जाणवलं पण खरी परिस्थिती फक्त आम्हाला आणि महावितरणमधील फोन आपटणार्या व्यक्तिलाच माहिती होती.
अर्ध्या तासाने सुषमा म्हणाली, ‘‘आपण नवीनच मिक्सर घेऊ. लाइट नसल्यावर याचा काही उपयोग होत नाही. चला खरेदीला जाऊ.’’
‘‘अगं काहीही काय बोलतेस! लाईट गेल्यावर या मिक्सरचा उपयोग होत नाही म्हणजे? सगळ्याच मिक्सरचा उपयोग लाईट गेल्यावर होत नाही. तुला काय बॅटरीवर चालणारा मिक्सर हवाय का? पण असला मिक्सर अजून बाजारात उपलब्ध नाही’’ आम्ही तिला समजावत म्हटलं.
‘‘ पण हा मिक्सरच नको. तुमच्या बहिणीने दिलाय! त्यामुळे कामाच्यावेळी नेमका बंद पडतो. तो सारखा माझ्यावर लक्ष ठेवून असल्यासारखा वाटतो. शिवाय अधून मधून टोमणे मारत असल्याचा मला भास होतो. मिक्सर पाहिल्यानंतर तुमच्या बहीणाबाईंची रोज आठवण येऊन अंगावर काटा येतो. रोज असं होणं बरोबर नाही. त्यामुळे आपण हा मिक्सर भंगारात टाकून, नवीन घेऊ.’’ तिचं बोलणं ऐकून आम्ही चिडलो मात्र काही बोललो तर भांडण झाल्याशिवाय राहिले नसते. त्यामुळे आम्ही गांधीगिरी करत तिच्याबरोबर येण्यास नकार दिला.
‘‘तू एकटीच जा. मला वेळ नाही’’ असं आम्ही म्हटलं.
‘‘अहो, मी एकटीच गेली असते; पण पण रिक्षा शोधा, एवढं मोठं सामान वागवा, शिवाय स्वतःजवळील पैसे खर्च करताना दहावेळा विचार करावा लागतो. त्यामुळे नुसता वैताग येतो. तुम्ही बरोबर असला की हे सगळे प्रश्न चुटकीसारखे सुटतात’’ बायकोने म्हटले.
‘‘ म्हणजे तुला फुकटचा हमाल हवाय तर…’’ आम्ही पुटपुटलो पण तिला ठामपणे नकार देणं हे पुढच्या संकटाला आमंत्रण देण्यासारखं असतं. त्यामुळे नाइलाजास्तव तिला घेऊन एका मोठ्या दुकानात गेलो. बराच वेळ विविध वस्तू पाहण्याचे तिचे काम चालू होते.
‘‘भैय्या, यह कुकर शिटीबरोबरच एक, दोन-तीन-चार बोलता है क्या? क्या होताय हमे व्हॉट्सऍप और फेसबुक के नाद मे कुकर के कितन्या शिट्ट्या हुया, हे ध्यान में नही रहता. अगर कुकर एक-दोन-तीन बोलता है, तो हमारा काम एकदम सोपा होगा…’’ बायकोचं हिंदी ऐकून दुकानदाराने डोळे मिटले. मग काय तासभर तिने ओव्हन, वॉटर फिल्टर, कुकर अशा बर्याच वस्तू खरेदी केल्या.
‘‘अहो, येथे मिक्सर चांगला मिळत नाही. आपण उद्या मॉलमध्ये जाऊन आणू’’ असे म्हणत ती दुकानाच्या पायर्या उतरू लागली. आम्ही मात्र तिने खरेदी केलेल्या वस्तू खांद्यावर ठेवून, रिकाम्या खिशाने पायर्या हळूहळू उतरू लागलो. एखादी गोष्ट खरेदी करण्यासाठी आलेली बायको, तीच वस्तू खरेदी करेल याची शाश्वती देता येत नाही. अशावेळी आपण चिडचिड करून काही उपयोग नसतो. सुखाने संसार करायचा असेल तर बायकोचं ऐकण्यातच शहाणपण असते, याची आम्हाला कल्पना आहे. तिच्या ‘हो’ ला ‘हो’ मिळवलं की बर्याच गोष्टी सहजसोप्या होतात. वाद होत नाहीत आणि विशेष म्हणजे सुखाची झोप लागते, हा आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे. त्यामुळे आम्ही शक्यतो तिच्याशी वाद घालण्याच्या फंदात पडत नाही. तिचा शब्द खाली पडू नये, यासाठी आमचे सतत प्रयत्न चालू असतात. तिला घरकामात मदत करणे, हा त्याचाच एक भाग आहे. आठवड्यातील तीन दिवस स्वयंपाकाची जबाबदारी आमची असते. त्यावेळी तिला आम्ही स्वयंपाकघरात येऊ देत नाही. ‘तू एका जाग्यावर शांतपणे बस’ अशा ठाम शब्दात आम्ही तिला सांगतो. शेवटी नवरा म्हणून एक हुकमत असते, ती आम्ही अशावेळी गाजवतो पण पलीकडून प्रतिउत्तर येऊ लागल्यावर तातडीने माघारही घेतो. बायकोवर कधी आवाज चढवावा, कधी माघार घ्यावी, कधी सपशेल लोटांगण घालावं याचं एक शास्त्र ठरलेलं असतं. ते अंगीकारलं तर संसार सुखी व्हायला कसली अडचण नसते. समस्त नवरेवर्गाने आनंदात राहण्यासाठी आमचा आदर्श घ्यावा, असे आम्हाला नेहमी वाटते. त्यामुळे मिक्सरवरून सकाळी थोडा वाद झाला मात्र परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आत आम्ही लगेच माघार घेऊन, तिच्या मनासारखं वागलो. बायकोच्या कपाळावर दिवसभर आठ्या दिसणार नाहीत, याची काळजी आम्ही नेहमी घेत असतो. चुकून आठ्या दिसू लागल्या तर तिचं डोकं दुखू अगर न दुखू कपाळाला बाम लावून, त्या आठ्या आम्ही घालवतो.
‘‘तुमचं लक्ष कोठंय?’’ असा किरकोळ प्रश्न विचारून तिला भांडायचा मूड येतो मात्र पुढील समरप्रसंग ओळखून आम्ही लगेचच तिच्या फोनवरून, तिच्या आईला मिसकॉल देतो. त्यामुळे पुढील तासभर तरी घरात शांतता नांदते, असा आमचा अनुभव आहे. तासाभरानंतर ‘मला खूप कामे आहेत, नंतर फोन करते’ असं बायको म्हणते त्यावेळी तर आमचं हृदय भरून येतं.
बायकोच्या आई-वडिलांविषयी त्याच्या मनात कितीही राग असला तरीही तो कधीही ओठांवर आणत नाही. ‘तुझे आई-वडील, जगात भारी आहेत. तुझ्या भावासारखा हुशार माणूस मी आजतागायत पाहिला नाही,’ अशी काही फोडणीची वाक्ये आम्ही आठवड्यातून एकदा-दोनदा म्हणतो. त्यामुळे अळणी स्वयंपाकाचीच काय पण संसाराचीही गोडी वाढते.
‘माझ्या लेकीची सगळी घरकामे जावई करतो. फारच गुणाचा आहे मात्र आमचा मुलगा बायकोपुढचा नंदीबैल आहे. सगळं तिचं ऐकतो,’ अशी वाक्यं सासरेबुवा माझ्याविषयी बोलू लागले की आमच्या अंगावर मूठभर मांस चढते.
अनेकदा आमच्या हातातून चूक होते. अशावेळी बायको आपल्याला धारेवर धरणार, याची खातरी पटते. अशावेळी न डगमगता ‘तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझ्या आयुष्याचं सोनं झालं. तू नसतीस तर माझ्या हातून अनेक चुका होऊन, माझं आयुष्य भरकटलं असतं’ असं म्हणून तिचा राग थोपवून धरतो.
‘घरात सुख-समृद्धी येऊ दे, वैताग आणि कटकटी बाहेर जाऊ दे’ अशी प्रार्थना आम्ही बायकोकडे पाहून करतो आणि त्यानंतर रात्रभर शांतपणे झोपी जातो.
आज संध्याकाळी स्वयंपाक करण्याची व बोलणी खायची आमची वेळ होती. त्यामुळे आम्ही तयारीत होतो.
‘‘अहो बी विंगमधील सुश्मिता तुम्हाला माहिती आहे का?’’ आम्ही स्वयंपाकघरात लुडबूड करत असताना सोफ्यावर निवांत बसून सुषमानं विचारलं. तिच्या या प्रश्नावर आम्ही सावध झालो. गुगली टाकल्यासारखा तिचा प्रश्न होता याची आम्हाला कल्पना आली मात्र प्रश्नाचं काय उत्तर द्यावं या पेचात आम्ही पडलो. ‘हो’ म्हणावं तर ‘सोसायटीतील सगळ्या बायकांचा बायोडाटा तुम्हाला पाठ असेल. त्याशिवाय तुम्हाला दुसरं काय काम आहे?’ हा टोमणा ठरलेला. ‘नाही’ म्हणावं तर ‘तुमच्यासारखे वेंधळे शोधूनही सापडणार नाहीत. तुमचं लक्ष कोठे असतं कोणास ठाऊक? शेजारी काय चाललंय, याची खबरबातही नसते’’ ही शालजोडीतील वाक्यं ठरलेली. त्यामुळे अशावेळी गप्प बसून पुढच्या प्रश्नाची वाट बघणे हिताचे असते, याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे आम्ही काहीही न बोलता शून्यात पाहू लागलो.
‘‘अहो, ती सुश्मिता नवर्यावर फार हुकूमत गाजवते आणि बिचार्या नवर्यापुढे नंदीबैलासारखी मान हलवण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. मी म्हणते, ती कशीही वागेन पण याने का आपला स्वाभिमान गहाण टाकावा?’’ बायकोने ठसक्यात म्हटले.
‘‘मलाही तुझं म्हणणं अगदी पटतं. आमचा ऑफिसमधील सौमित्रही असाच. सगळे निर्णय बायकोच घेते. अगदी याचे कपडेही तीच खरेदी करते. दोघेही शॉपिंगला गेले की, बाईसाहेब मस्त खरेदी करतात आणि हा पिशव्या वागवण्याचं आणि मुलं सांभाळण्याचं काम इमानेइतबारे करतो. अरे ही काय जिंदगी झाली काय?’’ आम्हीही फोडणी टाकली. बायकोच्या ‘हो’ला ‘हो’ करण्यात आमचा हात कोणी धरणार नाही.
‘‘सुश्मिताच्या लग्नाला दहा वर्षे तरी झालेत पण चैत्रालीच्या लग्नाला तर अजून सहा महिने व्हायचे आहेत पण आतापासूनच तिने नवर्याला मुठीत ठेवलंय. तिचा नवरा जरा मेंगळटच वाटतो म्हणा. आपल्या लग्नानंतर तुम्हीसुद्धा सुरुवातीला तसेच होते पण मी तुम्हाला सुधरवले की नाही? तुम्हाला तर साधं व्यवहारज्ञानही नव्हतं. कोठं कसं वागावं, याचं भानही नव्हतं! पण मी तुमच्यात आमूलाग्र बदल घडवला की नाही? पण ही चैत्राली बया नवर्याला सुधारण्याऐवजी त्याच्यावरच रुबाब दाखवते. या बाईसाहेब गाडीत बसायला आल्या की तिचा नवरा ड्रायव्हरसारखा गाडीचा दरवाजा उघडून देतो. तिने पाणीपुरी खायची म्हटलं, की हा एखाद्या ठेल्यापुढे गाडी उभी करून तिला एकेक पाणीपुरी गाडीत आणून देतो. तिच्या साड्या व ड्रेसला स्वतः इस्त्री करुन देतो. शॉपिंगला दोघे कधी गेले तर तिचा नवरा ओझी वागवून दमून जातो. ही बाईसाहेब गॉगल लावून, पर्स हलवत एखाद्या महाराणीसारखी पुढे जाते आणि तिचा नवरा एखाद्या हमालासारखा ओझी वाहतो. बायकोच्या एवढं पुढंपुढं करण्यात या पुरुषांचा काय फायदा असतो कोणास ठाऊक? तुमच्याशी मी नाही ना वागत असं कधी?’’ सुषमाने म्हटले.
‘‘छे… छे! उलट तू मला किती स्वातंत्र्य देतेस! माझे अनेक मित्र माझ्यावर जळतात ते काय उगाच नाही. तुझ्यासारखी बायको त्यांना मिळाली नाही म्हणून ते माझा हेवा करतात. आहेस कोठे?’’ आम्ही फुशारकीने म्हटले. त्यावर तिचा चेहरा खुलला.
‘‘अहो, थोडी सुंठ व इलायची घालून फक्कड चहा बनवा बघू. तुमच्याशी बोलून बोलून माझा घसा बसलाय’’ सुषमानं आदेश दिल्यावर आम्ही आज्ञाधारकपणे मान हलवली. त्यानंतर लगेचच चहाही नेऊन दिला.
‘‘तुम्हाला हज्जारवेळा सांगितलं असेल, चहा देण्यापूर्वी मला प्यायला पाणी देत जा म्हणून! पण लक्षात कोण ठेवणार?’’ तिने आवाज चढवत म्हटले.
‘हंड्यातून पाणी घेण्यासाठी दोन पावलं टाकता येत नाहीत का ? अशा आळशीपणामुळेच लग्नाआधी काकडीसारखी दिसणारी तू आता भोपळ्यासारखी झाली आहेस’ हे वाक्य आमच्या ओठांवर आले मात्र सुखी संसारासाठी संयम हा गुण अत्यावश्यक असतो. त्यामुळे आम्ही त्याचे पालन केले. उलट ‘सॉरी’ म्हणत मुकाट्याने पाणी दिले.
‘‘अगं आज भरलेली वांगी करू का? तुला आवडतात म्हणून मसाला पापडही करतो. तुझा घसा बसलाय म्हणून थोडं टोमॅटो सूप बनवतो’’ आम्ही म्हटलं.
‘‘वांगी वगैरे काही नको. गेल्या आठवड्यात तर तुम्ही केली होती. मी फार कौतुक केलं म्हणून लगेच तो मेनू रिपीट करू नका. आज मटार-पनीर आणि व्हेज बिर्याणी करा’’ बायकोनं ऑर्डर सोडली.
‘स्वतः करायला काय होतं? हॉटेलमध्ये बसल्यासारखं ऑर्डरी सोडू नकोस!’ हे वाक्य आमच्या ओठांवर आलं मात्र आम्ही लगेचच ते गिळलं.
‘‘चालेल. आधी भांडी घासून घेतो म्हणजे स्वयंपाक करणं सोपं जाईल. त्यानंतर किराणा दुकानातून मटार आणि पनीर घेऊन येतो’’ आम्ही म्हटलं.
‘‘अहो जा की मग. माझं तोंड काय बघत बसलाय एखाद्या वेंधळ्यासारखं?’’ सुषमानं असं म्हटल्यावर आम्ही पिशवी घेऊन लगबगीनं घराबाहेर पडलो.
त्यानंतर किराणा दुकानातून वाणसामान आणलं. मटार पनीर आणि व्हेज बिर्याणी केली.
‘‘छान, हल्ली स्वयंपाक तुम्हाला चांगला जमायला लागलाय बरं का. मी तुम्हाला दिलेले स्वयंपाककलेचे धडे वाया गेले नाहीत, याचा मला फार आनंद आहे. माझ्या आईने जे मला शिकवलं, ते मी तुम्हाला शिकवलं. त्यामुळे तुम्ही जो चांगला स्वयंपाक करता त्याचं सारं श्रेय माझ्या आईचं आहे. नाही तर तुमच्या आईनं तुम्हाला पार आळशी बनवलं होतं. लग्नाआधी तुम्हाला इकडची काडी तिकडं करता येत नव्हती. मी आल्यानंतर मात्र काडी काडी जमवून संसार उभा केला. तुमच्याकडच्या लोकानी आपल्या संसारात किती काड्या टाकायचा प्रयत्न केला पण मी खंबीर होते म्हणून सगळं निभावून नेलं. हा खंबीरपणा मला बाबांकडून मिळाला आहे. त्यांची शिकवणच मला तशी होती…’’ बायकोनं ‘आई-बाबापुराण’ सुरू केलं की मला जांभई येते मात्र मोठ्या कष्टानं आम्ही ती दाबून ठेवतो. झोपही अनावर होते मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार आम्ही सहन करतो. आज दिवसभर काम केल्यानं दमलो होतो. त्यामुळे झोपही लवकर लागली. उद्या स्वयंपाक करण्याचा वार तिचा असल्यानं आम्ही निश्चिंत होतो. झोप कधी लागली हेच कळेनासे झाले.
दुसर्या दिवशी सकाळी खाड्कन आमची झोप उडाली.
‘‘अहो, उठा ना गाढवासारखं काय लोळताय? गॅस चालू होत नाही’’ सुषमाच्या या आवाजानं आम्हाला धडकी भरली. मात्र तिचा आवाज ऐकून आम्ही फक्त कूस बदलली.
‘‘अहो, उठा! गॅस चालू होत नाही’’ सुषमानं अंथरूण खसकन हिसकावत म्हटलं. त्यावेळी मात्र आम्हाला राग आला.
‘‘अगं मग मी काय करू? माझ्या झोपण्याचा आणि गॅस चालू न होण्याचा काय संबंध आहे?’’ आम्हीही वैतागून म्हटलं आणि कूस बदलून परत झोपलो.
‘‘अहो, पंधरा दिवसांपूर्वी गॅस सिलिंडर तुम्हीच जोडला होता. तो चुकीचा जोडला असल्यामुळंच चालू होत नसेल’’ बायकोनं चुकीचं खापर आमच्या माथ्यावर फोडलं. त्यामुळं आम्ही नाईलाजानं उठलो व गॅस सिलिंडर चेक केला.
‘‘अगं सिलिंडरमध्ये काही प्रॉब्लेम नाही. लाईटर चालत नसल्यामुळं शेगडी पेटत नाही’’ आम्ही खुलासा केला.
‘‘तुम्हीच असला भंगार लाईटर आणला आहे. आजच आपण सिजन मॉलमध्ये जावून भारीतील दहा-बारा लाईटर आणू!’’ तिचा हा प्रस्ताव ऐकून पुन्हा आम्ही शून्यात पाहू लागलो. थोड्या वेळाने आम्ही दुकानातून लाईटर घेऊन आलो. नाही तर शंभर रुपयांच्या लायटरसाठी तिने मॉलमध्ये पंधरा-वीस हजार रुपये खर्च केले असते. त्यामुळे हे पैसे वाचवण्यासाठी आम्ही दिवसभर शांत बसलो. तिनं दिलेलं निमूटपणे खाल्लं मात्र असह्य झाल्यानं सायंकाळी आम्ही तोंड उघडलं.
‘‘अगं भजी किती कच्ची ठेवली आहेस? पाऊस पडतोय म्हणून गरमागरम भजी कर, असं सांगितलं तर ती कच्चीच ठेवली आहेस. दुपारची मेथीची भाजीही कच्ची होती. असं कच्चं-कुच्चं कसं खायचं? मी कसा चविष्ट स्वयंपाक करतो तसा तुला करायला काय होतं?’’ आम्ही खालच्या पट्टीत नाराजी व्यक्त करीत म्हटलं.
‘‘यात माझा काही दोष नाही. गॅस सिलिंडरचे भाव किती वाढलेत, हे बघताय ना? मग सिलिंडर पुरवून पुरवून वापरायला नको का? तुम्ही दिलेल्या पैशांत घरखर्च भागवणं आता अवघड झालंय. त्यामुळे मी ही आयडिया शोधली आहे’’ सुषमानं उत्तर दिलं.
‘‘अगं अशी काटकसर कोणी करतं का? कच्चं खाऊन, पोटदुखी झाली म्हणजे?’’ आम्ही म्हटलं.
‘‘उलट कच्चं खाणं आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं असतं. डॉक्टर तर सारखं म्हणतात, शिजवलेल्या अन्नापेक्षा कच्चं खाणं केव्हाही चांगलं. मोड आलेली कडधान्ये, सॅलड हे आपण कच्चं खातोच ना. शरीराला त्याचा किती फायदा होतो! त्यात आपण आता भाजी-पोळी-भात यांचा समावेश करू. रोज कच्चं खाल्ल्यानं आपली पचनशक्ती सुधारेल. वाघ-सिंहासारखे प्राणी त्यांचे अन्न कोठे शिजवून खातात? आपणही आता वाघ-सिंहांसारखं जगलं पाहिजे. यामुळे सिलेंडरचा खर्चही वाचेल आणि आरोग्यही सुधारेल’’ बायकोनं म्हटलं.
‘‘ सकाळी दिलेला चहाही पांचट होता. तो पण न उकळवताच दिला होता की काय?’’ आम्ही संशयाने विचारलं.
‘‘चहा संपूर्णपणे उकळवला होता मात्र दूध आणि साखर किती महाग झालीय ते तुम्ही बघताय. पूर्वी आपण एक लिटर दूध घ्यायचो पण आता मी पावशेर दूध घेते व त्यात तीन पावशेर पाणी मिसळून एक लिटर करते. मी कालच टीव्हीवर कीर्तन पाहत होते. त्यात लहानपणी अश्वत्थामाला पिठात पाणी मिसळून दूध म्हणून दिलं जात होतं. त्यामुळे अश्वत्थामा पराक्रमी झाला, असं कीर्तनकार सांगत होते. आपणही पिठात पाणी मिसळून, दूध म्हणून ते वापरावं काय? तेवढीच आपली बचत होईल. जे दुधाचं तेच साखरेचं. साखरेचे पाच-सहा दाणे मी चहात टाकले होते. तुम्हाला शुगरचा त्रास होऊ नये म्हणून आतापासूनच काळजी घेतलेली बरी…’’ सुषमाचा हा खुलासा ऐकून आम्ही कसनुसं हसलो.
‘‘खर्चात बचत म्हणून आपण कामवाल्या बाईलाही कायमची सुटी देऊ. खरं तर तिच्यापेक्षा तुम्हीच चांगलं काम करता. तुम्ही घरकाम करताना कसली कटकट करीत नाही की तुम्हाला पगार देण्याची चिंता नाही. शिवाय कामवाल्या बाईसारखं तुम्हाला सुटी देण्याची गरज नाही की तुम्ही दांड्याही मारत नाही. नोकरीचे आठ तास सोडले तर उर्वरित तास तुम्ही घरीच असता. शिवाय कामवाल्याबाईकडून छोटी-मोठी चोरी होण्याची भीती असते, तुमच्याबाबत तीही शक्यता नाही’’ बायकोनं असं म्हटल्यावर आम्हाला घाम फुटला.
‘‘एवढं सगळं करण्यापेक्षा तू स्वतःच्या खर्चात काही बचत कर की…’’ आम्ही म्हटलं.
‘‘म्हणजे काय? सुरुवात तर मी माझ्यापासूनच केली आहे. पूर्वी मी आठवड्यातून चार वेळा ब्युटीपार्लरमध्ये जायचे. आता दोनदाच जाते. पूर्वी मी महिन्यातून तीन वेळेला शॉपिंगला जायचे. आता दोनदाच जाते. आता यापेक्षा मी किती काटकसर करू? तुम्हीसुद्धा आता हेअरकलर आणणं बंद करा. पांढरे केस म्हणजे विद्वत्तेचं लक्षण असतं. ते लपवून तुम्हाला काय मिळतं? तेवढाच हेअर कलरचा खर्च वाचेल. त्या वाचलेल्या पैशात पाचशे रूपये टाकले तर माझा एकवेळचा ब्युटीपार्लरचा खर्च निघेल’’ सुषमानं असं म्हटल्यावर आम्ही मान डोलावली. खरं तिच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नसतो, हे आम्हाला अनुभवांती कळलं आहे.
दोन दिवसांनी सुषमाचा वाढदिवस आला. आम्ही सकाळीच न विसरता तिला शुभेच्छा दिल्या. ‘‘सुषमा, तुझ्या वाढदिवसानिमित्त आज तू काहीही काम करायचं नाही. सगळी कामं मीच करणार. तसेच दुपारचं जेवण मी घरी करतो व रात्रीचं जेवणही आपण हॉटेलमध्ये करू. तू तुझ्या माहेरच्या लोकाना व मैत्रिणींना हॉटेल अशोकमध्ये बोलव. आपण तिथेच वाढदिवस साजरा करू.’’ आमचं बोलणं ऐकून सुषमा सुखावली. तिच्या चेहर्यावर हास्य फुललं.
तिनं भराभर मैत्रिणी व माहेरी फोन करून वाढदिवसाचं निमंत्रण दिलं. दुपारी आम्ही सुषमासह मुलांना आग्रहानं खाऊ घातलं. त्यानंतर जेवणाची ताटे गोळा करून सगळी भांडी घासली, फरशी पुसून घेतली. अतिशय वेगानं ही कामं केल्यानं सुषमा आमच्याकडं कौतुकमिश्रीत नजरेनं पाहू लागली.
खरंच आपला नवरा घरातील सगळी कामं करतो म्हणून आपल्याला सुखाचे दिवस आलेत. हल्ली कोणता नवरा बायकोचे एवढे लाड पुरवतो? या विचारानं तिला समाधान वाटलं. कामं करण्याची अशीच सुबुद्धी शेवटपर्यंत मिळो, असं साकडं तिनं देवाला घातलं.
रात्री आठच्या दरम्यान तिच्या पाच मैत्रिणी, तिचे आई-बाबा, दादा व वहिनी, काका-काकू, मावशा व त्यांची मुलं सगळे हॉटेलमध्ये जमा झाले. सुरुवातीला सुषमानं केक कापला. त्यानंतर आम्ही जेवणाची ऑर्डर दिली. गप्पांची मैफल चांगलीच रंगली. थोड्या वेळानं वेटरनं सगळ्यांना जेवण वाढलं. कोणाला काय हवं, नको याची काळजी आम्ही घेऊ लागलो. सगळ्यांचं जेवण आटोपल्यानंतर आम्ही सवयीप्रमाणं सगळी ताटं गोळा करून स्वयंपाकघराकडे गेलो. वेटर व तेथील कर्मचार्यांचा विरोध पत्करून सगळी भांडी घासली. स्वतःच्या कामावर आम्ही फार खूश झालो. जेवणाच्या टेबलवर परत आल्यावर मिशीला पीळ देत आम्ही म्हणालो, ‘‘सुषमा, सगळी भांडी आरशासारखी लख्ख घासली आहेत. आता टेबल आणि फरशीसुद्धा स्वच्छ करून घेतो. अगदी घरच्यासारखं. तू दिलेलं ट्रेनिंग मी अजिबात वाया जाऊ दिलं नाही…’’ त्यावर सुषमानं कपाळावर हात मारला.
‘‘अहो आपण घरी नसून हॉटेलमध्ये आहोत याचं तरी भान ठेवा’’ सुषमानं दात-ओठ खात म्हटलं.
‘‘असं कसं? रोज मी घरी जे काम करतो ते हॉटेलमध्ये केलं तर बिघडतंय का?’’ आम्ही चेहरा निरागस करत म्हटलं.
‘‘मैत्रिणी व नातेवाईकांसमोर माझी इज्जत घालवलीत ना! तुम्ही घरी चला, तुमच्याकडं चांगलंच बघते’’ अशी हळू आवाजात ती पुटपुटली. त्यानंतर अतिशय खुशीत आम्ही घरी आलो. त्यावेळी तिनं कोपरापासून हात जोडले.
‘‘तुम्ही आजपासून घरात काडीचंही काम करू नका. स्वयंपाक-पाणी, धुणी-भांडी तर लांबची गोष्ट राहिली. वाढदिवशी तुम्ही माझ्या इज्जतीचा पार कचरा केलात. सगळे नातेवाईक आणि मैत्रिणींसमोर मला मान खाली घालायला लावलीत. तुम्हाला एवढा कसा कॉमनसेन्स नाही?’’ त्रागा करीत सुषमानं म्हटलं. तिचं बोलणं ऐकून आम्ही गालातल्या गालात हसू लागलो. आम्ही बरोबर डाव साधला होता. कित्येक दिवसानंतर आम्ही रात्री शांतपणे झोपलो आणि दुसर्या दिवशी उठण्यासाठी बायकोचा आमच्यामागं तगादाही नव्हता हे पाहून सुखावलो. सुख-सुख म्हणतात ते याच्यापेक्षा काय वेगळं असतं, असं म्हणून आम्ही पुन्हा अंगावर ब्लँकेट ओढून झोपी गेलो.
– सु. ल. खुटवड
सुप्रसिद्ध विनोदी लेखक आणि पत्रकार
9881099090
प्रसिद्धी – मासिक ‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक २०२४
नवरा माझा भवरा…
विनोदाचा धमाका!
खूप छान कथा!